विषारी मांस खाल्ल्याने सहा कुत्र्यांसह चार कावळ्यांचा मुंब्र्यातील रॉयल गार्डन परिसरात मृत्यू झाला आहे.
मुंब्र्यात कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याला कंटाळूनच स्थानिक रहिवाशांनी हा विषप्रयोग केला असावा अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पालिकेने मृत कुत्र्यांना दफन केले असून, या भागात विषारी मांस आले कसे याबाबतचा तपास मुंब्रा पोलिस करत आहेत.
रॉयल गार्डन परिसरात काही कुत्रे मृतावस्थेत पडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना या भागातून मांस आढळले आहे. या मांसात विषारी घटक असून, ते खाल्ल्यानेच कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हे मांस इथे कुणी टाकले याबाबत आसपासच्या रहिवाशांकडे पोलिसांनी चौकशी केली असून त्याबाबतची ठोस माहिती अद्याप हाती आलेली नाही. मुंब्र्यातील दोन शाळकरी मुलांना कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याच्या घटना काही महिन्यांपूर्वी घडल्या आहेत. ठाणे शहरातील कुत्रे पकडून मुंब्र्यात सोडले जातात असा आरोपही स्थानिकांकडून सतत होत असतो. त्याविरोधात एकदा आंदोलनही झाले होते. मुंब्र्यातील कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी पालिका स्तरावरून कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याने संतापलेल्या रहिवाशांनीच हा विषप्रयोग केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.