ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अटक करण्याची केंद्र सरकारमध्ये हिंमत नसल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्लीत आज (शनिवार) हेलिकॉप्टर गैरव्यवहारावरून आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. जंतर मंतर येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या प्रमुख नेत्यांनी आंदोलन केले. यावेळी केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका केली.
केजरीवाल म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप मिळून भ्रष्टाचार करत आहे. सरकारमध्ये सोनिया गांधींना अटक करण्याची हिंमत नाही. भाजप आणि काँग्रेसमध्ये सेटिंग झाले असून, सोनिया गांधींना ऑगस्टा प्रकरणी अटक करा. पंतप्रधानांनी भ्रष्टाचाऱ्यांना कारागृहात पाठविणार असे म्हटले होते. आता भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई का करत नाहीत. गांधी परिवाराजवळ मोदींची अनेक गुपीते आहेत. सोनियांना कारागृहात पाठविले तर आपल्याबद्दल काही खुलासा होईल, याची मोदींना भीती वाटत आहे. मोदींनी रॉबर्ट वद्रांना दत्तक घेतल्यासारखे वाटत आहे. मोदीजी सोनियांना एवढे का घाबरत आहेत.