पाकिस्तानी तुरूंगात गूढरित्या निधन झालेल्या कृपाल सिंग या भारतीयाचे पार्थिव आज मायदेशी आणण्यात आले. भारतीय अधिकाऱ्यांकडे कृपाल यांचे पार्थिव सुपूर्द करण्यात आल्यानंतर त्यांचे हृदय आणि जठर गायब असल्याची धक्कादायक बाब उघड झाली.
शवविच्छेदनानंतर कृपाल यांचे हृदय आणि जठर गायब असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अर्थात, कृपाल यांच्या शरीरावर कुठल्या जखमा आढळल्या नसल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. कृपाल यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आता मूत्रपिंड आणि यकृताच्या नमुन्यांची तपासणी केली जाईल. पाकिस्तानात शवविच्छेदन करण्यात आले त्यावेळी ही तपासणी करण्यात आली नसल्याचेही डॉक्टरांनी उघड केले. दरम्यान, कृपाल यांचे पार्थिव भारतीय अधिकाऱ्यांनी वाघा सीमेवर स्वीकारले. यावेळी उपस्थित असणाऱ्या कृपाल यांच्या भगिनी जागीर कौर आणि इतर कुटूंबीयांना अश्रू अनावर झाले. पाकिस्तानी तुरूंगात 2013 मध्ये मरण पावलेले आणखी एक भारतीय सरबजित सिंग यांच्या भगिनी दलबिर कौर याही यावेळी उपस्थित होत्या. पंजाबच्या गुरदासपूरचे रहिवासी असणारे कृपाल 1992 मध्ये वाघा सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले. तिथे त्यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानात साखळी बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप ठेऊन त्यांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला. लाहोर उच्च न्यायालयाने कृपाल यांची बॉम्बस्फोट प्रकरणातून मुक्तता केली. मात्र, त्यांची शिक्षा रद्द का करण्यात आली नाही याबाबत पाकिस्तानकडून कुठलेही कारण देण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वीच कृपाल लाहोरच्या कोट लखपत तुरूंगात मृतावस्थेत आढळले.