लातूर – जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर असताना सेल्फी काढल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंड चागल्याच अडचणीत सापडल्या आहेत. तसेच सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्यांनी दांडी मारली. पंकजा यांनी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगतले. पण या अनुपस्थितीबद्दल वेगळीच चर्चा सुरू असून, पंकजा मुंडेविरूद्ध मागील काही दिवसांपासून माध्यमांत होणारी टीका कारणीभूत असल्याचे सांगितल्या जात आहे.
पंकजा मुंडेंच्या या सेल्फीमुळे वादाचे मोहोळ उठले. सत्ताधारी भाजप दुष्काळाबाबत गंभीर नाही, अशी टीका विरोधकांनी सुरू केली. पंकजा यांची कृती म्हणजे फडणवीस सरकारच्या सध्या सुरू असलेल्या दुष्काळ पर्यटनाचाच एक भाग असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. तर शिवसेनेनेही पंकजा यांची ही कृती दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचे सेल्फी काढण्याचा मोह सरकारात जबाबदार पदावर असलेल्यांनी टाळायला हवा, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.