आंब्याच्या रसातून विष देऊन आई-वडिलांनीच केली मुलीची हत्या

आंब्याच्या रसातून विष देऊन आई-वडिलांनीच केली मुलीची हत्या

इतर जातीतील मुलाशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या पालकांनी पोटच्या पोरीचीच आंब्याच्या रसातून विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील नांजनगुड येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैसूरपासून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांजनगुड येथे राहणारी मधुकुमारी ही २१ वर्षीय तरूणी एक दलित मुलगा, जयरामच्या प्रेमात पडली होती. मात्र तिच्या आई-वडिलांना ही बाब पसंत नव्हती. त्यामुळे सोमवारी त्यांनी मधुकुमारीला आंब्याच्या रसात विष घालून दिले आणि तो पिताच तिला अस्वस्थ वाटू लागले. मात्र कोणीच तिच्या मदतीला धावून आले नाही वा डॉक्टरांनाही बोलावण्यात आले नाही. थोड्याच वेळात मधुकुमारीचा तडफडून मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी मधुकुमारीची आई मंजुळा (४८), वडील गुरुमपल्ला (६४) आणि भाऊ गुरूप्रसाद (२६) यांना अटक केली असून ज्या भांड्यातून विषमिश्रीत ज्यूस देण्यात आला तोही जप्त करण्यात आला आहे. तसेच मधुकुमारीची काही पत्रेही पोलिसांना मिळाली असून, त्यामध्ये तिने स्वत:च्या जीवाला धोका असल्याची भीती वर्तवली होती.
दरम्यान पोलिसांनी जयरामला सुरक्षाही पुरवली असून मधुकुमारीच्या पालकांविरोधात हत्या व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *