पुण्यातील सिमला ऑफिसमध्ये आई कारकून होती. दुबळ्या शरीराच्या; पण खंबीर मन लाभलेल्या आईनं वयाच्या पासष्टीपर्यंत आम्हाला भक्कम साथ दिली. शारीरिक, मानसिक आणि आर्थिकसुद्धा. आयुष्यभर राबून, पैसे कमवूनही तिला शेवटपर्यंत पैशांचा मोह नव्हता. स्थावर, सोनं, दागिने, हौसमौज यांत रस नव्हता. पण, तिन्ही मुलांवर प्रचंड जीव होता तिचा. म्हणायची, माझी मुलं हाच माझा दागिना! शिस्त आणि संस्कारांच्या बाबतीत ती कठोर होती. सोनार ज्या निगुतीनं दागिना घडवतो, तसं तिनं आम्हाला घडवलं.
घरातली कामं आवरून ती ऑफिसला जायची; पण परत आल्याबरोबर आम्ही तिघं नजरेस पडेपर्यंत तिला चैन नसायची. सुटीतही आम्हाला कुठल्या नातेवाइकाकडं पाठविण्यास ती राजी नसे. अलीकडं एक मूल असूनही त्याला शाळेत किंवा पाळणाघरात पाठवून “हुश्श‘ करणाऱ्या मैत्रिणी पाहते, तेव्हा आई प्रकर्षाने आठवते!
तिचा सारा वेळ आमच्यासाठीच असायचा. घरकाम करताना अभ्यास घे, कलाकुसर शिकव अशी सारखी तारेवरची कसरत सुरू असायची. रविवारी दुपारी कामं आवरून आम्हाला जवळ बसवून पेपर, गोष्टींची पुस्तकं वाचायला लावायची. आम्हाला वाचनाची सवय त्यामुळेच लागली. मला आठवतं, नुकतंच कॉलेजचं वारं लागलेला दादा मित्रांबरोबर संध्याकाळी चौकात उभा राहू लागला, अभ्यासात दुर्लक्ष होऊ लागलं. हे लक्षात आल्यावर एका संध्याकाळी आईनं रुद्रावतार धारण केला. दादाला बजावून तिनं एक फूटपट्टी तुटेपर्यंत फरशीवर आपटली. म्हणाली, “इतके फटके तुला द्यावेसे वाटतात; पण नाही देऊ शकत. म्हणून फरशीला मारलं.‘ त्या दिवसापासून दादाचं वागणं सुधारलं; आम्हा लहानांनाही जरब बसली. कितीही राग आला, तरी तिनं आमच्यावर हात उगारला नाही. स्वतःलाच त्रास करून घ्यायची अन् त्याचीच भीती जास्त वाटायची.
लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत तिचा सर्वांशी संवाद होता. चांगला समुपदेशकच होती ती. अनेकांचे फाटलेले संसार तिनं जोडले. ऑफिसातील सर्व घटना, माणसं यांचा दैनंदिन वृत्तांत घरी आल्यावर आम्हाला सांगायची. ते वर्णन इतकं हुबेहूब असायचं, की मी तिच्या ऑफिसात कधी गेले आणि एखादी अनोळखी व्यक्ती समोर आली, तर मी लगेच ओळखायचे! ऑफिसमधलं राजकारण, बसमधून प्रवास करताना येणारे अनुभव, असं सगळं मोकळेपणानं ती सांगायची. अलीकडं मित्रमैत्रिणींत कुणी “तू वयापेक्षा खूप मॅच्युअर्ड आहेस‘ असं मला म्हणतं, तेव्हा आईनं दिलेल्या शिदोरीचं माहात्म्य कळतं. तिनं माझं अनुभवविश्व समृद्ध केलं. चांगल्या- वाइटाची पारख करायला शिकवलं. त्यामुळेच आनंद साजरा करताना अतिरेक केला नाही आणि दुःखाचा डोंगर कोसळल्यावर व्यसनांच्या नादीही कुणी लागलं नाही.
माझ्या बंधूंचं समाजाकडून कौतुक होतं, तेव्हा ती आईच्या संस्कारांची किमया आहे, हे आम्हाला पक्कं ठाऊक असतं.
मला अभ्यासाचा कंटाळा होता. एकदा आई म्हणाली, “दरवर्षी ऑफिसातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक गुणवत्तेनुसार बक्षिसं मिळतात. माझ्या मुलांनाही ते मिळावं, असं वाटतं.‘ आठवीपासून मी अभ्यासात स्वतःला बुडवून घेतलं आणि ते बक्षीस मिळवलंच! त्या दिवशी आईच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद अजून दिसतोय डोळ्यांसमोर!
आम्ही लहान असताना तिला दर महिन्याला मोठं बेंड यायचं, उठणं- बसणंही मुश्कील व्हायचं; पण त्या स्थितीतही दादाकरवी सर्व सामान गादीजवळ घेऊन स्टोव्ह मांडून, प्रचंड वेदना सहन करीत दोन्ही वेळचा स्वयंपाक ती करायची. बाळाच्या ओढीनं कड्यावरून उडी टाकणारी हिरकणीच मला दिसायची त्या वेळी तिच्यात.
मुलांची लग्नं झाल्यानंतरही त्यांच्याकडून तिनं कधीच आर्थिक अपेक्षा केली नाही, उलट तीच सर्वांना मदत करीत राहिली. विचारलं तर म्हणायची, “मी काय पैसा वर नेणार आहे? हयात असतानाच माझ्या हातांनी खाऊ घातलं, तर काय बिघडलं?‘ अशी माझी आई; जिनं माझ्यातल्या आईलाही घडवलं!