नाशिकच्या मुख्यालयाच्या कवायत मैदानावर टळटळीत उन्हात उद्या लेखी परीक्षा
नाशिक – पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा मुख्यालयाच्या कवायत मैदानावर भरउन्हात घेण्याचा घाट पोलिस आयुक्तालयाकडून घातला जात आहे. शहरात एकाच वेळी हजार-दीड हजार विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील, असे महाविद्यालय असताना, पोलिस आयुक्तालयाकडून अवघ्या 644 उमेदवारांची परीक्षा भरउन्हात मैदानावरच घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
मंडप असले तरीही झळांचा त्रास
पोलिस आयुक्तालयातर्फे परीक्षार्थी उमेदवारांसाठी कवायत मैदानावर मंडप टाकले जाणार आहेत; परंतु 644 उमेदवार हे मैदानावर बसविल्यानंतर टाकला जाणारा मंडप पुरेसा ठरणार नाही. तसेच, मोकळ्या मैदानावर टाकला जाणारा मंडप हवेमुळे तग धरून राहील, याची कोणतीही शाश्वती नाही. वाढत्या उन्हामुळे उमेदवारांना भोवळ येण्याची शक्यता आहे. असे असतानाही पोलिस आयुक्तालयाकडून लेखी परीक्षा मोकळ्या मैदानावरच घेण्याचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हाकेच्या अंतरावर महाविद्यालय
पोलिस आयुक्तालयावर मराठा विद्याप्रसारक समाजाचे मराठा हायस्कूल व केटीएचएम महाविद्यालय आहे. केटीएचएम महाविद्यालयात विद्यापीठाच्या पदवी विभागाच्या परीक्षा सुरू असल्या, तरी अनेक वर्ग रिकामे असण्याची शक्यता आहे. तसेच, मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणीही पोलिस भरतीच्या 644 उमेदवारांची लेखी परीक्षा होणे सहज शक्य असतानाही लेखी परीक्षा कवायत मैदानावरच घेण्याचा घाट घातला जात आहे.