महाराष्ट्रातील मोठा दुष्काळ पाहता ३० एप्रिलनंतर राज्यात आयपीएलचे सामने खेळवू नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिला आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये होणा-या २० सामन्यांपैकी १३ सामने अन्यत्र खेळवावे लागतील. त्यात २९ मे रोजीच्या अंतिम सामन्याचा समावेश आहे.
आयपीएलच्या नवव्या हंगामाचे वेळापत्रक बिघडू नये म्हणून बीसीसीआयतर्फे खूप आटापिटा करण्यात आला. दुष्काळग्रस्त भागाला ६४ लाख लिटर पाणी पुरवण्यासह मुंबईतील फ्रँचायझी मुंबई इंडियन्स आणि पुण्यातील फ्रँचायझी रायझिंग पुणे सुपरजायंट्सतर्फे (आरपीएस) प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये जमा करण्याची तयारी बोर्डाने दर्शवली.
मात्र बीसीसीआयच्या ‘ऑफर’ फेटाळताना न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ३० एप्रिलपर्यंतचे सामने खेळण्याला परवानगी दिली. तसेच उर्वरित सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्यास सांगितले. राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आयपीएलच्या उर्वरित (मे महिन्यातील) सामन्यांना परवानगी नाकारल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या दणक्यामुळे बीसीसीआयला महाराष्ट्रातील सामने अन्यत्र खेळवण्याशिवाय अन्य पर्याय नाही.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल-९मध्ये एकूण ८ सामने होणार होते. त्यातील ४ सामने मे महिन्यातील आहेत. यात ‘फायनल’ सामन्याचाही समावेश आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे (पुणे) स्टेडियमवर ९ सामने खेळवले जाणार होते. त्यातील ६ सामने मे महिन्यातील आहेत.
यामध्ये बाद फेरीतील दोन सामन्यांचा समावेश आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) जामठा स्टेडियमवरील तिन्ही सामने मे महिन्यात होणार होते. त्यामुळे आयपीएलच्या नवव्या हंगामातील एकही सामना नागपुरात होणार नाही.