भल्याभल्यांना इथं हातोहात गंडवलं जातं तिथं अनाथ आणि अपंग असलेल्या विठ्ठलाची काय कथा? जिच्या जीवावर विठ्ठल जगत होता ती त्याची तीन चाकी सायकल पण चोरांनी सोडली नाही.
धडपड्या आणि कष्टाळू विठ्ठलच्या आयुष्यात नवा दिवस उगवला तो भगवान महावीर विकलांग सहाय्य समितीने दिलेल्या तीन चाकी सायकलीमुळं. तो नव्या जोमानं पेन विकायला जायला लागला…पण सोमवारी रात्री पाऊस आला आणि विठ्ठल मंगल टॉकीजजवळच पावसात अडकला.
सायकल लॉक करुन विठ्ठल तिथंच आडवा झाला. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याची नवी कोरी सायकल कुलूप तोडून कुणी तरी चोरली होती. त्याच्या मित्राचा मुलगा शाहिद मुलाणी व विठ्ठल या दोघांनी दिवसभर मिरजेत सायकल शोधली. पण सायकल काही दिसली नाही. शाहिदनं मग सरळ पोलिस ठाणं गाठलं. पण तिथही त्याला दाद मिळाली नाही.