शनी चौथ-यावर आता महिलांनाही प्रवेश

शनी चौथ-यावर आता महिलांनाही प्रवेश

शनिशिंगणापूर मंदिराच्या मुख्य चौथ-यावर जाण्यास यापुढे कोणालाही प्रवेश बंदी करणार नाही, असा निर्णय पाडव्याच्या मुहूर्तावर विश्वस्तांनी घेतला आहे. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आल्या तरी त्यांनाही चौथ-यावर प्रवेश करण्यास अडवणूक केली जाणार नाही, असे विश्वस्तांनी सांगितले.

सुरुवातीला मंदिर प्रशासनाने महिलांना प्रवेश देण्यास नाराजी दर्शवत आडमुठेपणा दर्शवला होता. मात्र विश्वस्तांचा विरोध डावलून ग्रामस्थांनी शुक्रवारी जलाभिषेक केला. त्यानंतर मंदिर समितीने ऐतिहासिक निर्णय घेत पुरुषांबरोबर महिलांनाही चौथ-यावर प्रवेशाचा निर्णय घेतला.

पाडव्याच्या दिवशी शनीच्या शिळेवर गंगाजलाचा जलाभिषेक केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे. मात्र, यंदा महिला आंदोलनामुळे वाद पेटल्याने मंदिर समितीने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला न जुमानता स्थानिकांनी चौथ-यावर प्रवेश करुन जलाभिषेक केला.

दरम्यान, पुरुषांनी चौथ-यावर प्रवेश केल्यास महिलाही चौथ-यावर जाणार, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला होता. न्यायालयानेही महिला व पुरुष असा भेदभाव न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा वादावादी टाळण्यासाठी विश्वस्तांनी हा निर्णय घेतला.

विश्वस्तांच्या या निर्णयामुळे स्त्री-पुरुष समानता येईल, असे देसाई यांनी म्हटले आहे.

शनि चौथ-यावरील प्रवेशाबद्दल आनंद आहे. पण कायद्याचे पालन होत नाही. देवस्थानने नाराजीने हा निर्णय घेतला आहे, असे मत याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *