रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे आज रेपो दरात पाव टक्क्याची (0.25 टक्के) कपात केली. या कपातीनंतर रेपो दर 6.75 टक्क्यावरुन 6.50 टक्के इतका झाला आहे. या दरकपातीमुळे गृह, वाहन कर्जासह इतर कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बँकांमधील मुदतठेवींवरील व्याजही कमी होऊ शकते. रेपो दरात कपात करण्यात आली असली तरी रिव्हर्स रेपो दरात बँकेने पाव टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे
चालू आर्थिक वर्षात विकासदर 7.6 टक्के इतका राहिल, या अंदाजावरही बँकेने आज शिक्कामोर्तब केले. रिझर्व्ह बँकेचे चालू आर्थिक वर्षांतील पहिले पतधोरण आज सकाळी जाहीर करण्यात आले. आजच्या धोरणात व्याजाचा दर अर्धा टक्क्यांनी कमी होण्याची बाजारपेठेला अपेक्षा होती, मात्र रघुराम राजन यांनी पाव टक्क्यांचीच कपात घोषित केली. दरम्यान, सीआरआरमध्ये (रोख राखीव प्रमाण) कोणताही बदल करण्यात आला नसून तो 4 टक्क्यांवर कायम आहे. किरकोळ स्थायी सुविधांच्या (एमएसएफ) दरातही 0.75 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
आता आरबीआयने दरकपात केल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थात कर्जाप्रमाणेच ठेवींवरील व्याजदरदेखील कमी झाल्याने केवळ व्याजावर अवलंबून असलेल्या नागरिकांना झळ सोसावी लागणार आहे.