उत्तर प्रदेशातील पिलभीत येथे 1991 मध्ये झालेल्या बनावट चकमक प्रकरणी 47 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बनावट चकमकीमध्ये 10 यात्रेकरूंना ठार मारल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने या सर्व पोलिसांना दोषी ठरवले आहे.
12 जुलै 1991 रोजी शिख यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस पीलभीत येथे पोलिसांनी अडवली आणि त्यामधील 10 यात्रेकरूंना बळजबरीने खाली उतरवले. त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आले. नंतर जंगलात नेऊन त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, असे या प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रामध्ये म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला होता.
या प्रकरणी 57 पोलिसांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र 1991 पासून आतापर्यंत 10 पोलिसांचा मृत्यू झाला. ही बनावट चकमक करण्यामागे पोलिसांना मिळणाऱ्या बढती आणि बक्षिसाची हाव असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांना मारणाऱ्या पोलिसांना बक्षीस दिले जात असे. ते मिळवण्यासाठी काही यात्रेकरूंना दहशतवादी भासवून ही बनावट चकमक करण्यात आली होती.