कोकण वगळता महाराष्ट्राच्या सर्वच भागातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अकोला आणि जळगाव येथे ४३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. विदर्भातही तापमान ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
तुलनेने मुंबईत पारा कमी असला तरी दुपारच्या वेळेत मुंबईकर घामाघूम होत आहेत. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील पारा वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई (३१ अंश सेल्सिअस), पुणे (३९ अंश सेल्सिअस), जळगाव (४३ अंश सेल्सिअस), नाशिक (३८ अंश सेल्सिअस),धुळे (४१ अंश सेल्सिअस), सांगली (३८ अंश सेल्सिअस), सातारा (३९ अंश सेल्सिअस), कोल्हापूर (३७ अंश सेल्सिअस), नागपूर (४० अंश सेल्सिअस), चंद्रपूर (४० अंश सेल्सिअस), अमरावती (४० अंश सेल्सिअस), वर्धा (४१ अंश सेल्सिअस), अकोला (४३ अंश सेल्सिअस), औरंगाबाद (३९ अंश सेल्सिअस), नांदेड (४२ अंश सेल्सिअस), परभणी (४२ अंश सेल्सिअस).
जळगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी?
जळगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जामनेर तालुक्यातील भागवत काळबैले (४५) यांचा अचानक मृत्यू झाला. जिल्हा बॅँकेत काम करणारे काळबैले यांना दोन दिवसांपूर्वी चक्कर येऊन अस्वस्थ होऊ लागले.
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बरे वाटले. मात्र पुन्हा रात्री त्यांना त्रास होऊ लागला आणि पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान शनिवारी जळगावात तापमान तब्बल ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते.