पुरेशी कागदपत्रे नसतानाही राजस्थानमध्ये पोचलेल्या 25 पाकिस्तानी नागरिकांना राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
पाकिस्तानमधील काही नागरिक मथुरा आणि हरिद्वारला धार्मिक उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी भारतात दाखल झाले होते. त्यांच्याकडे केवळ उत्तराखंडमधील हरिद्वार आणि उत्तर प्रदेशमधील काही धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठीचा व्हिसा होता. मात्र ते शुक्रवारी रात्री जोधपूरमधून एका खाजगी बसने राजस्थानमधील रामदेवरा येथे पोहोचले. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या सर्व नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हे सर्व नागरिक पाकिस्तानमधील मीरपूर, अमरकोट, थारपारकर आदी जिल्ह्यांमधील भारतात आले होते.