वनस्पती तेलाची आयात ९.५१ टक्के वाढणार

तेलबियांचे उत्पादन कमी आणि खाद्यतेलाची मागणी जास्त राहणार असल्याने २०१५-१६ या काळात वनस्पती तेलाची आयात ९.५१ टक्क्यांनी वाढून १६० लाख टन होण्याची शक्यता आहे.

२०१५-१६ या पीक वर्षात कपाशी बियाणे (सरकी) आणि खोबरे यासह खरीप आणि रबी हंगामात होणारे तेलबियाणे उत्पादन ३१८.१६ लाख टन होण्याची शक्यता आहे. २०१४-१५ मध्ये ते ३३६.७९ लाख टन होते. सॉल्व्हेंट अ‍ॅक्स ट्रॅक्टर्स असोसिएशन (एसईए) या औद्योगिक संघटनेने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, २०१५-१६ (नोव्हेंबर ते आॅक्टोबर) या काळात वनस्पती तेलाची एकूण आयात १६० लाख टन राहण्याची शक्यता आहे. २०१४-१५ मध्ये ही आयात १४६.१ लाख टन होती.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, समान व्यावसायिक संधीसाठी कच्चे आणि रिफाईन्ड तेलातील आयात शुल्काचे अंतर ७.५ टक्क्यांवरून वाढवून १५ टक्के केले पाहिजे. सध्या रिफायनरीची जेवढी क्षमता आहे, त्याच्या ४० ते ५० टक्के क्षमतेचाच वापर केला जातो. आयात शुल्क वाढविल्यास या कारखान्यांची क्षमताही वाढेल.

सध्या वनस्पती तेल उद्योगाला वाईट दिवस आले आहेत. गेल्या काही महिन्यांत रिफाईन्ड तेलाची आयात वाढल्याने तेल कारखान्यांच्या क्षमतेवर वाईट परिणाम झाला आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.

गेल्या वर्षी सरकारने सप्टेंबरमध्ये कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क ७.५ टक्क्यांवरून वाढवून १२.५ टक्के, तर रिफाइन्ड खाद्यतेलावरील शुल्क १५ टक्क्यांवरून वाढवून २० टक्के केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *