राज्यात भीषण पाणी टंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नढाळ गावाच्या हद्दीतील जवळपास ४० एकर परिसरातील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत लोधिवली मधील सर्व सदस्यांनी आवाज उठवला आहे. मुंबईतील काही धनिकांकडून शेतात दगडमातीचा भराव टाकून तलाव बुजवण्याचे काम सुरू आहे. या बाबत महसूल विभागाचीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्याने तहसीलदार अजीत नराळे यांनी या अनधिकृत उत्खनन करून भराव करणा-यांविरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणी तब्बल ८७ लाखांपेक्षा जास्त दंड महसूल विभागाकडून संबंधितांना ठोठावण्यात आला आहे.
लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असणारा या पाझर तलावात मातीचा भराव टाकण्याचे काम ग्रामपंचायतीने हाणून पाडले असून जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असणा-या तलावात अनधिकृत काम करणा-यांविरोधात कारवाईची मागणी होत असताना कर्जत लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कामाची चौकशी महसूल विभागाने सुरू केली आहे. त्याचा सविस्तर अहवाल कर्जत लघु पाटबंधारे विभागाकडून मागविण्यात आला आहे.
अलीकडे या तलावाच्या मजबुतीकारणासाठी जिल्हा परिषदेने कोटय़वधी रुपये खर्च केले असून या तलावाच्या मागील बाजूस तलाव लगत असणा-याठिकाणी मोठय़ा प्रमाणात मातीभरावाचे काम केले जात आहे. मागील दोन वर्षापासून हे काम संबंधित यंत्रणांचा डोळा चुकवून केले जात होते. त्यामुळे तलावाचे पाणी साठवणुकीचे क्षेत्र अंदाजे ४ एकर कमी करण्यात आले आहे. लोधिवली ग्रामपंचायतीने या बाबत तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर तातडीने चौक मंडळ अधिकारी म्हात्रे, तलाठी संजय जांभळे आदींनी भरावाच्या ठिकाणची पहाणी केली. मोजमापे घेतली त्यांची छायाचित्रे व सविस्तर अहवाल संबंधित विभागाला पाठवाला. त्यावेळी अनधिकृत भराव झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणी तुषार दिनेश मोतीवाला यांना ८७ लाख ९७ हजार ८०० इतका दंड आकारण्यात आला असून त्याची नोटीस संबंधिताना देण्यात आली आहे.