मुंबई बंदर हलवण्याचा केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने आखला कुटिल डाव

 मुंबई बंदर हलवण्याचा केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने आखला कुटिल डाव

प्रदूषण आणि वाहतूक कोंडीचे कारण पुढे करीत मुंबई बंदर हलवण्याचा कुटिल डाव केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने आखला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी तसे स्पष्ट केल्यानंतर त्याबाबत सर्वच राजकीय पक्षांतून तीव्र प्रतिक्रिया आणि संताप व्यक्त झाला आहे.

मुंबईचे बंदर कोणत्याही परिस्थितीत हलवू देणार नाही. मुंबईत राहणा-या मराठी माणसाचा रोजगार या बंदरावर अवलंबून आहे. मराठी माणसाच्या जीवावर उठलेल्या या निर्णयाविरुद्ध जबरदस्त लढा उभारू, अशी घोषणा सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. मुंबईत उमटलेल्या संतापाच्या या काही प्रतिक्रिया..

मुंबई बंदर हलवण्याची भूमिका मुंबई आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस कधीही सहन करणार नाही. मुंबईचे आणि मराठी माणसाचे महत्त्व कमी करण्याकरिता भाजपा सरकारने हे डाव आखलेले आहेत. त्याविरोधात लाचार झालेली शिवसेना सत्तेसाठी भाजपासोबत आहे. मात्र मराठी माणूस मुंबई बंदर वाचवण्यासाठी सर्वशक्तीनिशी लढयात उतरेल आणि त्या लढयात मीही अग्रभागी राहीन, अशी जबरदस्त प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई बंदर हलवण्याची नितीन गडकरी यांची भूमिका मुंबई आणि महाराष्ट्राला कधी मान्य होणार नाही, असे सांगून श्री. नारायण राणे म्हणाले की, यापूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेचे तीन विभाग, सागरी सुरक्षा केंद्र, हि-यांचे मार्केट, मेटल मार्केट मुंबईबाहेर नेण्याचे कारस्थान भाजपा सरकारने केले, त्याविरुद्ध मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करणा-या शिवसेनेने आवाज उठवला नाही आणि शिवसेना सत्तेकरिता मूग गिळून गप्प बसली.

मुंबई बंदराच्या परिसरात बीपीटीची ११०० एकर जी जमीन आहे ती जमीन धनदांडग्यांच्या घशात घालण्याकरिता भाजपा सरकार मुंबई  बंदर हलवित आहे. परंतु हे बंदर मुंबईचा आर्थिक प्राण आहे. ते हलवण्याचा प्रयत्न झाला तर मराठी माणूस रस्त्यावर उतरेल आणि त्या लढाईत मी अग्रभागी राहीन, असेही नारायण राणे यांनी सांगितले.

मुंबई बंदर बंद केले की, बीपीटीची ४० गोडाऊन मोकळी होणार, त्यासाठी हे बंदर हलवण्याचा राजकीय डाव आहे. या ४० गोडाऊनची जागा कोणत्या भांडवलदाराच्या घशात घालण्याचे कारस्थान शिजत आहे

मुंबई बंदर हलविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी कारणे काहीही सांगत असले तरी त्याच्यामागची वस्तुस्थिती वेगळी आहे. याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण करणारी आहे.

महाराष्ट्रातील एक एक प्रकल्प इतरत्र हलविण्याचा सपाटा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सुरू झाला आहे. गुजरातचा विकास कसा होईल आणि महाराष्ट्र मागे कसा पडेल, याचेच डावपेच आखले जात आहेत. गुजरातच्या विकासाला आमचा विरोध नाही. परंतु जाणीवपूर्वक महाराष्ट्राला दुबळा करण्यासाठी जे कारस्थान केले जात आहे त्याला आमचा विरोध आहे.

मुख्य म्हणजे हे धडधडीत दिसत असताना भाजपाचा किंवा शिवसेनेचा एकही नेता त्याविरोधात बोलत नाही, ही अत्यंत दु:खद बाब आहे. पक्षीय मतभेद विसरून भाजपाचे हे कारस्थान उधळून लावले पाहिजे.

मुंबई बंदर गुजरातला हलविण्यात येणार असल्याची चर्चा दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. त्याला आता गडकरी यांनी पुष्टी दिली आहे. केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आल्यापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी सपाटा लावला आहे.

मुंबई बंदराची जमीन ही प्राईम लोकेशनला आहे. त्या जागेवर डोळा आहे. येथे बीपीटी कर्मचा-यांची वसाहत आहे. त्याशिवाय मुंबई बंदराच्या जागेवर मोठी झोपडपट्टी आहे. त्यांचे काय करणार  या गरीब झोपडपट्टीधारकांना हकलून लावून तिथे बिल्डर आणण्याचा भाजपाचा मानस आहे.

म्हणूनच आम्ही ही ‘सुटा-बुटा’तली सरकार आहे, असे म्हणतो. परंतु भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही मराठी माणसांना बेरोजगार आणि बेघर होऊ देणार नाही. मुंबई बंदर हलविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

भाजपाचे सरकार केंद्रात आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हलविले जात आहेत. मुंबईचे आणि मराठी माणसांचे महत्त्व कमी करण्याचा हा डाव आहे. अशा वेळी सत्तेमध्ये असलेले शिवसेनेचे मंत्री, खासदार याबद्दल काय बोलत नाहीत, हा खरा प्रश्न आहे.

मुंबई बंदराची ९०० एकर जागा आहे. मराठी माणसाला उद्ध्वस्त करून ही जागा कुणा उद्योगपतीच्या घशात घालायची आहे काय  नितीन गडकरी हे चांगले नेते आहेत. त्यांच्याकडून मराठी माणसांच्या मोठया अपेक्षा आहेत.

तेच अशी भूमिका घेत असतील याला काय म्हणावे. मुंबई बंदराने अनेक मराठी माणसांना रोजगार दिलेला आहे. तो हिरावला जात असेल तर त्याविरोधात सर्वानी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.

भाजपा सरकारला मुंबईबद्दल कोणतीही आस्था नसून काही महिन्यांपूर्वीच गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन मेहता यांनी मुंबईला येऊन येथील सर्व उद्योगधंदे आणि व्यापा-यांना गुजरातला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यातच गुजरातचे मनसुबे स्पष्ट होतात.

मुंबई बंदर ही मुंबईची शान आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे मुख्यालय अन्यत्र हलविण्याचा त्यांचा प्रयत्न आहेच, त्यातच मुंबई बंदरालाही हलवण्याचे मनसुबे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशा-यावरूनच चालले आहे.

त्यामुळे अशाप्रकारे मुंबई बंदर अन्यत्र हलविण्यास काँग्रेस पक्षाचा विरोध आहेच. त्यामुळे याचा तीव्र निषेध आपण व्यक्त करतो. पर्यावरण आणि प्रदूषणामुळे जर हे बंदर हटवावे,असे वाटत असेल तर यापूर्वी असे प्रदूषण होत नव्हते का

मुंबई बंदर कुठेही हलविण्याचा प्लॅन नाही. हा केवळ ग्लोबेल्स तंत्राचा प्रचार आहे. मुंबईचे महत्त्व काही कमी करण्याचा प्रयत्न नसून उलट वाढवण्याचाच प्रयत्न राहील. मुंबईचे महत्त्व तेवढेच राहणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *