गिरणी कामगारांचे आज जेलभरो आंदोलन

भाजपा-शिवसेनेला सत्तेत येऊन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’सारख्या योजनांचा धडाका केवळ धनदांडग्यांसाठी सुरू आहे. हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असणा-या गिरणी कामगारांसाठी ‘मेक इन गिरणगाव’ योजना कधी राबवणार ? असा सवाल करत गिरणी कामगार मोठय़ा संख्येने शुक्रवारी रस्त्यावर उतरणार आहेत. ‘गिरणी कामगार कृती संघटने’च्या वतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता आझाद मैदानात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. सरकार घरांबाबत सकारात्मक निर्णय घेत नाही; तोपर्यंत जेल न सोडण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे तसेच आंध्र प्रदेशातून हजारोंच्या संख्येने गिरणी कामगार जेलभरो आंदोलनात सहभागी होणार आहेत. गोविंद मोहिते, दत्ता इस्वलकर, जयप्रकाश भिलारे, नंदू पारकर, प्रवीण घाग, निवृत्ती देसाई, बबन गावडे, हेमंत गोसावी आदी गिरणी कामगार नेते आंदोलनाचे नेतृत्व करतील. कामगारांच्या घरांच्या न्याय मागणीवर सरकारने केवळ आश्वासन देऊन कामगारांची घोर निराशा केली आहे. यापूर्वी १ मे या कामगार दिनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धरणे आंदोलन करत घरांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते; मात्र पोकळ आश्वासनापलीकडे काहीच घडले नसल्याचा संताप कामगारांनी व्यक्त केला आहे. घरांची सोडत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते; मात्र आता मार्च उजाडला तरी सोडत काढली नसल्याने कामगारांत असंतोष पसरला आहे. एमएमआरडीएच्या १० हजार तयार घरांचे वाटप करावे, १० गिरण्यांच्या जमिनीवर घरांचे बांधकाम सुरू करावे, म्हाडाद्वारे ६ गिरण्यांच्या जागेवर बांधण्यात आलेल्या घरांची सोडत जाहीर करावी आणि १ लाख ४८ हजार कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी नियोजन करावे, या मागणीसाठी जेलभरो करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *