‘सध्याचा भारतीय संघ कमालीचा समतोल असून हा संघ जगाच्या पाठीवर कुठेही सर्वोत्तम कामगिरी करू शकतो,‘ असा विश्वास कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज (शुक्रवार) व्यक्त केले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये गेल्या दहापैकी नऊ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळविला आहे.
संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या विजयानंतर धोनी म्हणाला, यंदाच्या वर्षभरात ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आम्ही जो संघ उतरविला, त्यातील समतोल पाहता हा संघ कुठल्याही वातावरणामध्ये, कुठेही सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. विशेषत:, ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये तर हा संघ अजोड आहे. या संघात आमच्याकडे तीन चांगले वेगवान गोलंदाज आहेत. दोन दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत आणि गरज पडल्यास गोलंदाजी करू शकणारे आणखी दोन-तीन खेळाडू आहेत. माझ्या मते, हा समतोल उत्तम आहे. इतके असूनही गोलंदाजीमध्ये काही जास्त धावा गेल्या, तरीही आठ सक्षम फलंदाज आमच्याकडे आहेत.