विरार येथील शिल्पी वर्मा या महिलेच्या अपहरण प्रकरणाचं गूढ अखेर आज उलगडलं. याच अपहरण प्रकरणाला आता प्रेमाची कलांटणी मिळाली आहे. प्रियकराच्या साथीनं शिल्पीनंच हा अपहरणाचा बनाव रचल्याचं समोर आल आहे.
शिल्पी वर्मा आणि तिचा प्रियकर अमरेश कुमार हे दोघं २०१३ पासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच लग्नही झालं आहे. मात्र त्याबाबत कोणताही ठोस पुरावा त्यांच्याकडे नव्हता. प्रतिष्ठीत कुंटुंब असल्यानं आपल्या मुलीला आणि कुंटुंबाला बदनामीचा सामना करावा लागू नये म्हणून हा अपहरणाचा बनाव आखल्याचा समोर आलं आहे. जीवनातील पुढील व्हेलंनटाईन डे एकत्र साजरा करण्यासाठी अमरेश कुमार हा आग्राहून विरारला आला. हे दोघे काही दिवसानंतर विदेशात जाऊन आपलं वैवाहिक जीवन जगणार होते.
विरारसारख्या शहरात तेही मुंबईच्या वेशीवर असलेल्या शहरात भर चौकात बंदुकीचा धाक दाखवित महिलेचं अपहरण होतं. त्यामुळं पालघर पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. हाती कोणताही पुरावा नाही, साक्षीदार तिची मैत्रिण तीही फिर्यादी. पोलिसांसाठी जवळपास पंधरा दिवस डोकेदुखी ठरलेल्या अपहरण प्रकरणाचा अर्नाळा सागरी पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावला.
आपल्या प्रियकराबरोबर पळून जाण्यासाठी तिने हा सर्व बनाव रचल्याचा समोर आलं आहे. अर्नाळा पोलिसांनी शिल्पी आणि तिचा प्रियकर अमरेश कुमार याला पंजाब येथील लुधियानाच्या एका भाडयाने राहणाऱ्या घरातून अटक केली. हे दोघे विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते.
फेसबुकच्या माध्यमातून शिल्पी आणि अमरेश कुमारची ओळख झाली. शिल्पीचा पती सरदेन्दू हा बोईसरला एका खाजगी कंपनीत मॅनेजर पदावर आहे. तर शिल्पीची २१ वर्षाची मुलगी देखील आहे. २०१३ रोजी शिल्पी कोलकत्ताहून दिल्लीला जात असताना कानपूर येथे याच प्रियकराबरोबर पळून गेली होती. शिल्पीला आता मात्र व्हॅलेंटाइन आपल्या प्रियकराबरोबर साजरा करायचा होता. आपल्या मुलीची आणि कुंटुंबाची आपण पळून गेल्यानंतर बदनामी होण्यापेक्षा अपहरणाचा हा प्लॅन शिल्पीने अमरेश बरोबर आखला. अमरेश हा केकच्या दुकानात शेफचं काम करायचा.
शिल्पी आणि अमरेश कुमार यांनी विरारहून थेट पंजाब येथील लुधियाना शहर गाठलं होतं. मोठया शिताफीने अर्नाळा पोलिसांना त्यांना शोधून काढलं. अमरेश कुमार हा एका लॅपटॉपच्या दुकानात सेंकड हॅण्ड लॅपटॉप विकत घेणार होता. लॅपटॉप खरेदीसाठी आलेले शिल्पी आणि अमरेश हे दोघं त्याचवेळी पोलिसांच्या जाळ्यात आडकले.