जिल्हाधीकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर मराठवाड्यात पुन्हा एकचा चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. सकाळपासून मराठवाड्यातील छावण्यांमध्ये जनावरांना चारा द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे.
‘जिथं चाऱ्याची गरज आहे तिथं उद्या सकाळपर्यंत चारा छावण्या सुरु करण्यात येतील. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.’ अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसेंनी दिली आहे.
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये मुबलक चार उपलब्ध असल्याचा दावा करत सरकारनं चारा छावण्या बंद केल्या होत्या. त्यानंतर आता एकनाथ खडसेंनी पुन्हा चारा छावण्या सुरु करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र, प्रत्यक्षात छावण्या सुरु झाल्या नव्हत्या. आज अखेर छावण्या सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोमवारीच लातूर, बीड आणि उस्मानाबादमधील चारा छावण्या बंद करण्याचे आदेश महसूल खात्यानं दिले होते. सध्या पुढचे तीन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे, त्यामुळं चारा छावण्यांची गरज नसल्याचं खडसेंनी म्हटलं होतं. त्यानंतर काल दिवसभर मराठवाड्यात तीव्र आंदोलनंही झाली.