शिक्षिकेच्या मुलीवर प्रेम केल्याने रांचीमध्ये एका शालेय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मुलीवर प्रेम करत असल्याच्या रागातच शिक्षिकेनेच त्या विद्यार्थ्याची हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी त्या शिक्षिकेसह पती आणि मुलींनाही अटक करण्यात आली आहे.
विनय महतो असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता सातवीत शिकत होता. तर नजमा खातून असे अटक झालेल्या शिक्षिकेेचे नाव आहे.
गेल्या शुक्रवारी पाच फेब्रुवारीला शिक्षक वसाहतीजवळ विनयचा मृतदेह आढळून आला. तेथेच नजमाचे कुटुंब राहत होते. विनयच्या डोक्यावर आणि अंगावर जखमा होत्या. त्यावेळी त्याच्या वडिलांनी शाळेच्या व्यवस्थापनावर तक्रार दाखल केली.
पोलिसांनी संशयावरून शाळेतील चार शिक्षकांना ताब्यात घेतले. त्यापैकी एक नजमा ही होती. चौकशी केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
शिक्षिका नजमा यांच्या मुलीवर विनयचे प्रेम होते. मात्र, ही गोष्ट नजमाला खटकत होती. त्या रागातूनच विनयची हत्या केली, अशी कबूली नजमाने दिल्याचे पोलिसांकडून समजते. या प्रकरणी नजमासह पती, आणि त्या मुलीसह दोन्ही मुलींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.