मुंबई- हिट अँड रन प्रकरणी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
येत्या आठवड्यात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करणार असल्याचे समजते.
मुंबई उच्च न्यायालयाने सलमान विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत त्याची सुटका केली होती. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असून यासंदर्भात सरकारी वकिलांना निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुर्वी केली होती.
सलमानच्या लँड क्रूझर गाडीने ८ सप्टेंबर २००२ रोजी ब्रांद्र्यात फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता, तर चारजण जखमी झाले होते.