गुलाम अली यांच्यावरून ठाण्यात ‘संघर्ष’?

गुलाम अली यांच्यावरून ठाण्यात ‘संघर्ष’?

ठाणे – ठाण्यात आगामी काळात शिवसेना-मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट ‘संघर्ष’ होण्याची शक्यता आहे. याला निमित्त ठरले आहेत ते पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने ११ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘ठाणे फेस्टिव्हल’साठी गुलाम अली यांना आमंत्रण देण्यात आले असून, त्यासाठी त्यांनी वेळही दिल्याचे ट्विट रविवारी आव्हाड यांनी केले आहे. तर पाकिस्तानी कलाकारांना सोयीनुसार विरोध करणा-या शिवसेनेने लगेचच गुलाम अली यांना ठाण्यात पाय ठेवू देणार नसल्याचे म्हणत दंड थोपटले आहे. मनसेनेही शिवसेनेची री ओढली आहे. गझल आणि गुलाम अलींच्या आवाजावर प्रेम करणा-या सुसंस्कृत चाहत्यांचा या ‘संघर्षात’ मात्र विनाकारणच ससेहोलपट होणार आहे.

या राजकीय संघर्षाला न जुमानता गुलाम अलींचे स्वागत करण्याचा निर्धार ठाणेकरांनी केला असून राजकीय पक्षांनीही त्यांचा अभिनिवेश बाजूला ठेवावा, असे आवाहन अनेक संघटनांनी केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या ‘संघर्ष’ संस्थेच्या वतीने ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पारसिकनगर येथील ९५ फूट मार्गावर या आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून या फेस्टिव्हलमध्ये गुलाम अली यांचा कार्यक्रम होणार आहे.

मुंबईत होणा-या गुलाम अली यांच्या मैफलीला शिवसेनेने विरोध केला होता. आता या कार्यक्रमाला शिवसेना आडवी आल्यास शिवसेनेचा विरोध पाहता कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर थेट मुख्यमंत्र्यांची मदत घेऊ, अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे. शिवाय जर केरळ आणि कोलकात्यात गुलाम अलींचे कार्यक्रम होऊ शकत असतील, तर ठाण्यात का नाही? असा सवालही त्यांनी विचारला आहे. हा कार्यक्रम सुरळीत व्हावा, तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच कुणाचाही विरोध असला तरी आमचा कार्यक्रम होणारच, असे त्यांनी जाहीर केले आहे.

मात्र गुलाम अली नेमक्या कुठल्या दिवशी ठाण्यात येतील, याची तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही.याबाबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गुलाम अली यांना ठाण्यात पायही ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तसेच आव्हाड यांची ही घोषणा म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे, अशी टीकाही केली आहे. तर मनसेनेही गुलाम अली यांचा कार्यक्रम ठाण्यात होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत ठाण्यात शिवसेना-मनसे विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *