दीर्घकाळानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा डावखुरा स्टायलिश फलंदाज युवराजसिंग याने बेधडक कामगिरी करण्यास आपण समर्पित असून संघाने आपल्यावर विश्वास दाखवावा असे सहकाऱ्यांना आवाहन केले.
बीसीसीआय टिव्हीवर युवराज म्हणाला, ‘मीरपूर येथे टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २१ चेंडूंवर केलेल्या ११ धावा गेल्या दीड वर्षांपासून स्मरणात आहेत. अंतिम सामन्यातील ती खराब कामगिरी होती. गेल्या काही काळापासून फिटनेस, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीवर मी भर देत असून आगामी सत्रात चांगली कामगिरी होईल, अशी आशा आहे.’
युवराज पुढे म्हणाला, ‘आॅस्ट्रेलिया दौऱ्यात उत्तम कामगिरी करीत भारतात आयोजित टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियात स्थान मिळविणे हे माझे पहिले काम असेल. आम्ही २००७ मध्ये टी-२० विश्वचक तसेच २०११ मध्ये वन डे विश्वचषक जिंकलो तेव्हा संपूर्ण देश रोमहर्षित होता.’ वन डे विश्वविजयाचा नायकही युवराजच होता.
तो म्हणतो कुठल्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूला स्थानिक पातळीवर तयार होणे लाभदायी ठरते. मी स्थानिक क्रिकेटमध्ये यशस्वी होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनरागमन केले आहे. संघात समावेश तर झाला पण आंतरराष्ट्रीय कामगिरी उंचाविण्यासाठी सहकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे राहील.’