भारताला प्रथमच आयसीसी पुरस्कार नाही

भारताला प्रथमच आयसीसी पुरस्कार नाही

आयसीसी पुरस्कारांच्या एका तपाच्या इतिहासात प्रथमच भारताचा संघ किंवा क्रिकेटपटूला पुरस्कार मिळालेला नाही.

गेल्या वर्षी (२०१४) मध्यमगती भुवनेश्वर कुमारच्या रूपाने भारताने पुरस्कारांच्या यादीत नाव मिळवले. त्याची एलजी पीपल्स चॉईस पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यापूर्वी २०१३मध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्याच पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

तसेच चेतेश्वर पुजारा ‘सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख क्रिकेटपटू’ ठरला होता. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, कसोटीपटू किंवा वनडेपटूपैकी पुरस्कार मिळवणारा भारताचा शेवटचा क्रिकेटपटू विराट कोहली आहे. २०१२मध्ये तो सर्वोत्कृष्ट वनडेपटू ठरला होता.

२०१० वर्षात भारतीयांची आयसीसी पुरस्कारांवर छाप दिसली. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसह (सचिन तेंडुलकर) सर्वोत्कृष्ट कसोटीपटूचा (वीरेंदर सेहवाग) पुरस्कार भारतात आला होता. त्यावेळी भारताचा संघ सर्वोत्कृष्ट कसोटी संघ ठरला होता.

तेंडुलकरपूर्वी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा मान केवळ राहुल द्रविडने (२००४) मिळवला आहे. सर्वोत्कृष्ट कसोटीपटू (सेहवाग, २०१०) पुरस्कार भारताच्या क्रिकेटपटूंच्या वाटय़ाला एकदाच आला आहे.

सर्वोत्कृष्ट वनडेपटूचा पुरस्कार आजवर भारताच्या क्रिकेटपटूंना तीनदा मिळाला आहे. महेंद्रसिंग धोनीने २००८, २००९ असा सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळवला. त्यानंतर तीन वर्षापूर्वी (२०१२) कोहली सर्वोत्कृष्ट वनडेपटू ठरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *