भुकेल्यांना बँकेतून अन्न मिळतं असं म्हटलं तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाल बँक आणि भाकरी याचा काय संबंध? मात्र औरंगाबादेत अशी एक रोटी बँक आहे, जी प्रत्येक भुकेल्यांना अन्न देते. एका सामाजिक संस्थेने ही बँक सुरु केली आहे
या बँकेत सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे अन्नदान सुरु असतं. बरं या बँकेत आतापर्यंत 250 दात्यांनी रोटी बँकेत नोंदणी केली असून ते दररोज बँकेत अन्न आणून देतात. अन्न चांगलं राहावं म्हणून फ्रीजमध्ये ठेवण्यात येतं आणि तिथे येणाऱ्या कोणत्याही भुकेल्याला हे अन्न दिलं जातं. यामधून समाधान मिळत असल्याचं अन्नदान करणारे सांगतात.
या रोटी बँकेने निराधारांची भुकेची भ्रांत थांबवली आहे. निराधार मुलं असो किंवा वृद्ध, या बँकेतील ठेवीवर त्यांचं पोट भरतं. त्यामुळे खातेदारांची संख्याही वाढत आहे.
प्रत्येकाला खाण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कोणीही उपाशी झोपू नये, प्रत्येकाच्या तोंडात घास जावा, म्हणून ही बँक सुरु केल्याचं संस्थेचे पदाधिकारी युसूफ मुकाती सांगतात.
लग्न समारंभात उरलेलं अन्नही या ठिकाणी नेण्याची सोय संस्थेने केली आहे. या ठिकाणी आलेल्या अन्नाची तपासणीसुद्धा केली जाते. या माध्यमातून भुकेल्यांना चांगलं आणि पोटभर अन्न मिळतं.