देशातील विरोधकांना संपवण्यासाठी पंतप्रधान मोदी हे सीबीआयचा दुरुपयोग करत आहेत. दिल्लीच्या सचिवालयावर टाकलेल्या छाप्यात काहीही आढळले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केली.
जेटलीप्रकरणावरून दिल्ली विधानसभेत बोलताना केजरीवाल म्हणाले की, अर्थमंत्री अरुण जेटली यांना वाचवण्यासाठीच सीबीआयचे छापे टाकण्यात आले. या छाप्यांना आठ दिवस झाले. अनेकांच्या चौकशा झाल्या. आता त्यातून काय मिळाले हे माननीय पंतप्रधानांनी जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी दिले.
मोदींमध्ये हिंमत असल्यास त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर छापे मारून दाखवावेत, असे आवाहन त्यांनी दिले.
दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आयोग नेमला आहे. १३ वर्षे अध्यक्ष राहिलेल्या जेटली यांनी या आयोगासमोर आपले निर्दोषत्व सिद्ध करावे. डीडीसीएने स्टेडियम उभारणीत गैरव्यवहार केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे केजरीवाल म्हणाले.
घरातून कार्यालयाकडे निघालेलो असताना दिल्ली सचिवालयावर सीबीआय छापे पडल्याची बातमी मला समजली. त्यावर मला विश्वासच बसत नव्हता. मोदी सरकारने माझ्या कार्यालयावर छापे मारले, उद्या ते आसाम, बंगाल, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयावर छापे मारतील, यामागे मोठा कट आहे, असे ते म्हणाले.