दिल्लीतील द्वारकाजवळ आज (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला.
बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांचीकडे जात असलेले बीएसएफचे सुपर किंज विमान द्वारकाजवळील बागडोला गावाजवळ कोसळले. या विमानातून बीएसएफचे दहा अधिकारी प्रवास करत होते. या दुर्घटनेत दोन वैमानिकांसह एक तांत्रिक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी आहेत. यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर दुःख झाल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. विमानात बीएसएफची अभियंता टीम होती. रांची येथे हेलिकॉप्टरची दुरुस्ती करण्यासाठी हे सर्वजण जात होते. विमान दुर्घटनेमागील कारण समजू शकलेले नाही.

