मागील अवकाळी पावसात प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागलेल्या कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतक-यांना मिळणारी मदत सहहिस्सेदारांच्या संमती पत्राच्या जाचक अटीमुळे अडकून पडली होती. ही अडचण दूर करून यापुढे केवळ हमीपत्रावर ही मदत देण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत शुक्रवारी दिले.
आमदार नितेश राणे यांनी तसेच ‘प्रहार’ने वेळोवेळी हा विषय लावून धरला होता. याबाबत शुक्रवारी ‘प्रहार’ प्रसिद्ध केलेल्या वृत्तातही आंबा-काजू उत्पादकांच्या या प्रलंबित मागणीकडे सरकारचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यात आले होते. यानंतर तातडीने कार्यवाहीची चक्रे फिरली असून यासंदर्भातील शासकीय आदेश जारी होईल अशी चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील आंबा-काजू उत्पादक शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानंतर कोणतीही तात्काळ मदत सरकारने जाहीर केली नव्हती.