पॅरिस येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदेतील मसुद्याचे जगभरातून स्वागत होत आहे. जागतिक तापमान दोन अंशांनी कमी करण्याचे ‘लक्ष्य’ या परिषदेत जागतिक नेत्यांनी ठरवले. भारताने या परिषदेत ‘हवामान समन्यायी’ असावे अशी भूमिका घेतली होती. या परिषदेत ती सफल ठरली आहे, असे भारताने सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, आम्हाला मिळालेली पृथ्वी वाचवण्याची मोठी संधी या परिषदेने दिली. जगासाठी हा क्षण मोठय़ा बदलाचा आहे. या हवामान परिषदेतील करारामुळे पृथ्वीवरील वातावरणात अधिक चांगले बदल होऊ शकतील.
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सिस होलांद म्हणाले की, शनिवारचा दिवस हा पृथ्वीवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक शतकांपासून पॅरिसमध्ये आतापर्यंत अनेक क्रांत्या झाल्या आहेत. आताची क्रांती ही अत्यंत शांततापूर्ण मार्गाने झाली आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून म्हणाले की, हवामान परिषद ही पृथ्वीचे भावी जीवन सुरक्षित करण्याची मोठी संधी आहे. भारताचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, या परिषदेत विकसनशील देशांचा विकासाचा हक्क मान्य करण्यात आला. पर्यावरण वाचवण्याबरोबरच प्रगती करता येऊ शकते. शनिवारचा दिवस हा ऐतिहसिक आहे.
जगाने स्वीकारलेला करार हा केवळ करार नव्हे तर पृथ्वीवर राहणा-या ७०० कोटी जनतेच्या आशा जागवणा-या आहे. आपण पृथ्वीचे मालक नसून विश्वस्त आहोत, अशी भूमिका महात्मा गांधीजींनी मांडली होती, याची आठवण जावडेकर यांनी करून दिली.
कमकुवत व अमहत्वाकांक्षी करार
पॅरिसमध्ये झालेला करार कमकुवत व अमहत्वाकांक्षी आहे. या करारातून कोणतीही उद्दिष्टं ठेवलेली नाहीत. या करारातून विकसित देशांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे, अशी टीका दिल्लीतील संस्था सेंटर फॉर सायन्स अॅँड एन्व्हॉरमेंट या संस्थेने केली आहे.
ग्रीसपीस इंटरनॅशनलने सांगितले की, संयुक्त राष्ट्रांना जगातील सर्व देशांना एकत्रित करणे जमले नाही. मात्र, या परिषदेअंतर्गत १९५ हून अधिक देश एकत्र येऊन त्यांनी कराराला मान्यता दिली. पॅरिस करार हा दीर्घपल्ल्याचा प्रवास आहे.
अमेरिका, युरोप, चीन आणि भारताने या हवामान कराराला विज्ञान व दूरदृष्टीचा विजय आहे. ही बाब पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे गरिबी नष्ट करून विकास साधता येऊ शकेल, असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी सांगितले.