आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढणारे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचं निधन झालं. शरद जोशी यांनी आज सकाळी 9 वाजता पुण्यातल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते.
शरद जोशी यांच्या मुली परदेशात असल्यानं त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र अंत्यविधी कुठे आणि कधी करायचा याची वेळ अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे आपल्या या लाडक्या नेत्यावर प्रेम करणाऱ्यांनी लगेचच पुण्यात येण्याची घाई करु नये. असं आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आलं आहे.
शेतकरी चळवळीत शरद जोशी यांचं फार मोठं योगदान होतं. 2004-2010 ते राज्यसभेचे सदस्यही होते. नाशिकच्या कांदा आंदोलनाने शरद जोशी प्रसिद्धीच्या झोतात आले आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांची युनोमधील नोकरी, शेतकऱ्यांविषयीची कळकळ, सहज, सोप्या भाषेत संवाद साधण्याची हातोटी या गुणांमुळे शरद जोशींनी आपला एक वेगळा ठसा उमटविला होता.
शरद जोशींचे सर्वात मोठे यश म्हणजे ‘शेतकरी तितका एक एक’ हा नारा देऊन त्यांनी शेतकरी समाजाला जात, धर्म, प्रांत, भाषा हे भेद विसरायला शिकवलं होतं. 1980 साली नाशकात कांदा आणि ऊस दराप्रश्नी शरद जोशी शेतकरी संघटनेला घेऊन रस्त्यावर उतरले आणि शरद जोशी हे नाव घराघरात पोहोचलं होतं.