देशातील मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कंत्राट जपानला देण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. हैदराबाद हाऊस येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
बुलेट ट्रेन प्रकल्प यशस्वी झाल्यास मुंबई व अहमदाबादमधील प्रवासाचा वेळ सात तासांवरुन अवघ्या दोन तासांवर येणार आहे. बुलेट ट्रेनकरिता 505 किलोमीटर लांब मार्ग तयार करण्यासाठी सुमारे 98,000 कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. जपानने प्रकल्पासाठी 80 टक्के अर्थसाह्य दिले आहे. दिलेल्या कर्जावर एक टक्क्यापेक्षा कमी दराने व्याज आकारण्यात येणार आहे. परंतु भारताला बुलेट ट्रेनसाठी लागणाऱ्या उपकरणांपैकी 30 टक्के उपकरणे जपानकडून खरेदी करावी लागणार आहेत.
बुलेट ट्रेनशिवाय दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या अणुकरार व संरक्षण क्षेत्रातील उपकरणांच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानी नागरिकांना येत्या मार्च महिन्यापासून भारतात आगमन झाल्यानंतर व्हिसा देण्याची घोषणा केली आहे.