मुसळधार पावसाने थैमान घातलेल्या तामिळनाडूमधील पावसाचा जोर ओसरला असून परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे.
चेन्नईमध्ये शुक्रवारी पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मदतकार्याला वेग आला आहे. शहराच्या विविध भागांत साठलेले पाणीही ओसरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी येत्या ४८ तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विविध भागातील वीजपुरवठा खंडीत झाला असून रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपल्यामुळे चेन्नईतील रुग्णालयातील १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, भूदल, नौदल सैनिकांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांसाठी जेवणाची पाकिटे खाली सोडली जात आहेत. संपूर्ण शहर पाण्याखाली बुडालेले असताना, लोकांशी संपर्कही होत नसल्याने बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.
तामिळनाडूतील पूरस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी घेतला. त्यांनी तातडीने १००० कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत जाहीर केली होती.
चेन्नईत १३७ वर्षांमधील हा सर्वाधिक पाऊस आहे. पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई सेवा पूर्णत: बंद आहेत. चेन्नई विमानतळ ६ डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आले आहे. पुढील ४८ तासात चेन्नईत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पावसामुळे ५० लाखांहून अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या शहरांची पाहणी केली असून त्यांनी पाच हजार कोटींच्या निधींची मागणी केली आहे.