दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने झुंजार खेळी करत शतक झळकावले आहे. रहाणेचे हे भारतीय भूमीवरचे पहिले कसोटी शतक आहे. रहाणेच्या या झुंजार शतकामुळे भारताने समाधानकारक धावसंख्या गाठली आहे.
भारताने शुक्रवारी सात बाद २३१ धावांवरून दुस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर रहाणे ८९ धावांवर नाबाद राहिला होता. रहाणेला अश्विनची चांगली साथ मिळाली. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.
गुरूवारी झालेल्या पहिल्या खेळात डावखुरा सलामीवीर शिखर धवन (३३) आणि कर्णधार विराट कोहलीने (४४) फिरोजशा कोटला मैदानावर थांबण्याची हिंमत दाखवली तरी अन्य सलामीवीर मुरली विजय (१२), ‘वनडाऊन’ चेतेश्वर पुजारा (१४) तसेच मधल्या फळीतील रोहित शर्मा (१) आणि वृद्धिमन साहाला (१) झटपट माघारी धाडताना पिएड आणि अबॉटने भारताची अवस्था ६ बाद १३९ धावा अशी केली.
भारताचे काही खरे नाही, असे वाटत असतानाच पाचव्या क्रमांकावरील अजिंक्य रहाणेने बहारदार खेळी करताना भारताला सुस्थितीत आणले. त्याने रवींद्र जडेजासह (२४) सातव्या विकेटसाठी ५९ धावा आणि आर. अश्विनसह आठव्या विकेटसाठी ३३ धावांची नाबाद भागीदारी करताना भारताला अडीचशेच्या घरात नेले.