कोल्हापुरातील भवानी मंडापात एका असहाय्य महिलेची प्रसुती झाली. विशेष म्हणजे मंदिरात भीक मागून गुजराण करणाऱ्या महिलांनी ही प्रसुती केली.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील बेळगावजवळच्या संकेश्वरमध्ये राहणाऱ्या अर्चना सुरेश आडी या महिलेला पंधरा दिवसांपूर्वी सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढलं. माहेरच्यांनीही आसरा दिला नाही. त्यामुळे पोटुशी असलेली अर्चना दारोदारी धक्के खात कोल्हापुरात पोहोचली.
चार दिवसांपासून उपाशी पोटी ती गरोदरपणाच्या वेदना सहन करत होती. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तीने बाळाला जन्म दिला. मंदिरात झोपलेल्या इतर भिकारी महिलांनी तिचं बाळंतपण केलं.
सकाळी बोचऱ्या थंडीत बाळ आणि महिला कुडकुडत असताना एका सामाजिक कार्यकर्त्याने दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अर्चना ही कर्नाटक राज्यातील संकेश्वर इथं राहणाऱ्या सुरेश आडी यांची दुसरी पत्नी. लग्न होऊन पाच वर्ष झाली. कौटुंबिक वादातून अर्चनाला गरोदर अवस्थेत घराबाहेर काढलं आणि ती कोल्हापुरात भवानी मंडपात आली. इथेच तीने बाळाला जन्म दिला.