रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या सात जागांसाठी १५ संघांमध्ये चुरस

रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या सात जागांसाठी १५ संघांमध्ये चुरस

रणजी करंडकाच्या साखळीतील नवव्या आणि अंतिम फेरीला मंगळवारपासून (१ डिसेंबर) सुरुवात होत आहे. माजी विजेता मुंबईने यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले आहे. बाद फेरीतील उर्वरित सात जागांसाठी तब्बल १५ संघांमध्ये चुरस आहे.

सर्वाधिक ३२ गुणांसह मुंबईने ‘ब’ अव्वल स्थान राखताना अंतिम आठ संघांत दिमाखात प्रवेश मिळवला. सात सामन्यांत चार विजय मिळवण्याची करामत मुंबईसह सौराष्ट्राला (क गट) साधता आली आहे. मात्र मुंबई संघ यंदाच्या मोसमात ‘अजिंक्य’ आहे. ‘ब’ गटात उर्वरित दोन स्थानांसाठी गुजरात (२३ गुण), पंजाब (२० गुण), उत्तर प्रदेश, तामिळनाडू (प्रत्येकी १८ गुण), मध्य प्रदेश (१७ गुण) आणि बडोदा (१६ गुण) अशा सहा संघांमध्ये चुरस आहे.

मुंबईने घरच्या मैदानावर गुजरातला हरवल्यास तामिळनाडू वि. पंजाब लढतीतील विजेत्याला उपांत्य फेरीची आशा बाळगता येईल. ‘अ’ गटात दिल्लीने आठ सामन्यांतून २५ गुण मिळवत अव्वल स्थान राखले आहे. मात्र त्यांच्यासह दुस-या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या आसाम आणि बंगाल (७ सामन्यांतून २५ गुण) तसेच चौथ्या स्थानावरील कर्नाटक (७ सामन्यांतून २४ गुण) आणि पाचव्या स्थानावरील विदर्भलाही (७ सामन्यांतून २२ गुण) गटात अव्वल तीन संघांत स्थान मिळवण्यासह बाद फेरीची आशा बाळगता येईल.

‘क’ गटात सौराष्ट्राचे (७ सामन्यांत २९ गुण) पुढील फेरीतील स्थान जवळपास निश्चित असले तरी गटातून दुस-या स्थानासाठी केरळ (२५ गुण), झारखंड आणि हिमाचल प्रदेश (प्रत्येकी २४ गुण) या संघांत चुरस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *