सरदार वल्लभभाई पटेल हे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते; तर भारतामधील लोकशाही व्यवस्था कोसळून या देशाचीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे मत प्रसिद्ध दलित कार्यकर्ते व लेखक कांचा इलाया यांनी व्यक्त केले आहे.
“नरेंद्र मोदी यांनी पटेल हे देशाचे प्रथम पंतप्रधान झाले असते; तर देशाचा प्रवास वेगळ्या पद्धतीने झाला असता, असे नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीदरम्यान म्हटले होते. पटेल यांची हिंदु महासभेशी जवळीक होती. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहूच दिली नसती. भारताची राज्यघटना मग मनुस्मृतीच्या समर्थकांनी लिहिली असती. आपलीही अवस्था पाकिस्तानसारखी झाल्ली असती; लोकशाही कोसळली असती. लोकशाही व्यवस्थेच्या पहिल्या 17 वर्षांतच भारताचा पाकिस्तान झाला असता,‘‘ असे मत इलाया यांनी मांडले.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी नेते सुधींद्र कुलकर्णी यांनीही इलाया यांच्या या मतास समर्थन दर्शविले. “”सध्याच्या आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी पटेल यांचा विशेष उपयोग नाही. आपल्याला पोलाद पुरुषाची गरज नाही. सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेल्या सहृदयी नेत्याची या देशास सध्या गरज आहे,‘‘ असे कुलकर्णी म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या चर्चासत्रामध्ये बोलताना इलाया व कुलकर्णी यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.
इलाया यांच्या या विधानाचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.