दुष्काळदाह : गणवेशासाठी शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

सततच्या नापिकीमुळे आपल्या शिक्षणासाठी कुटुंबाकडे पैसे नसल्याचे पाहून, चिंतातुर झालेल्या बाळापूर तालुक्यातील नववीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. बाळापूर तालुक्यातील दधम येथे विश्वनाथ खुळे हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. मोठा मुलगा वैभव हा इयत्ता अकरावीत शिकत असून, लहान मुलगा विशाल हा अकोला येथील महाराणा प्रताप विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होता. खुळे कुटुंबाकडे दोन एकर शेती आहे. सलग दोन वर्षांच्या नापिकीमुळे मशागत व लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच आर्थिक संकटात सापडले. कुटुंबीय आपल्या शिक्षणासाठी पैसे कोठून आणतील, आपले शिक्षण पूर्ण होईल की नाही, अशा विवंचनेत असलेल्या विशालने नैराश्यातून रविवारी सकाळी विषारी औषध प्राशन केले.

दिवाळीपूर्वीपासून धरला होता गणवेशासाठी हट्ट

विशालने दिवाळीपूर्वीपासूनच गणवेश आणि पाठ्यपुस्तकांसाठी कुटुंबीयांकडे हट्ट धरला होता. मात्र पैसेच नसल्याने त्याचा हट्ट पूर्ण होत नव्हता. त्याला काही पुस्तके मिळाली होती. उर्वरित पुस्तकांसाठी त्याने कुटुंबीयांकडे आग्रह धरला होता.

डोक्यावर ४० हजार रुपयांचे कर्ज

विशालचे वडील विश्वनाथ यांनी शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून ४० हजार रुपयांचे कर्ज काढले. मात्र सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडता आलेले नाही.

नापिकीमुळे जवळ पैसा नाही. त्यामुळे दसरा-दिवाळीसारखे सणही कुटुंबीय साजरे करू शकले नाहीत. मुलांना शिक्षित करण्यासाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न त्यांना भेडसावत होता.

सततच्या नापिकीमुळे विशालच्या शिक्षणात अडथळा येत होता. त्यामुळे तो निराश झाला. त्याच्या बोलण्यातूनही निराशा जाणवत होती. या निराशेतूनच त्याने जीवन संपविले. – विश्वानाथ खुळे, विशालचे वडील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *