एकिकडे वातावरणात गारवा निर्माण होऊ लागलेला असतानाच ठाणे व रायगड जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी पावसाने हजेरी लावली.
विजांच्या जोरदार गडगडाटासह आलेल्या या पावसाने सर्वसामान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत या भागातही पावसाने हजेरी लावली.
या दोन्ही जिल्ह्यात सकाळपासून उकडत होते. उष्म्याने नागरिकांचा जीव हैराण झाला होता. मात्र, सायंकाळी ४ वाजल्यापासून ढग दाटून आले व अंधार पसरला होता. तसेच सोसाटय़ाचा वाराही सुरू होता. त्यानंतर सायंकाळी ७.३० च्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले. हा पाऊस रात्रीपर्यंत सुरूच होता.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत
दरम्यान, या पावसाने सर्वसामान्यांचे जनजीवन मात्र विस्कळीत झाले होते. कल्याणमध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर वाहतूक ठप्प झाली होती. तसेच रस्तेही रिकामे झाले होते. तर पश्चिम भागातील शिवाजी चौकातल्या दक्षिणामुखी मारुती परिसरात पाणी साचले होते.
उल्हासनगरमध्ये हिरा घाट परिसरात लावलेला एक बॅनर सोसाटय़ाच्या वा-यामुळे कोसळला. मात्र त्यात कुणीही जखमी झालेले नाही. तर अंबरनाथ शहरातील काही सखल भागांत या पावसाने पाणीही साचले होते. शिवाय कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागांत पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
पाणीटंचाई दूर होण्यास मदत?
यंदा पावसाळयात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. परिणामी धरणांत असलेला मर्यादित पाणीसाठा पाहता ठाणे जिलत लघुपाटबंधारे विभागाने ३० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र शनिवार व रविवारी झालेल्या पावसात धरणक्षेत्रांत पावसाने चांगली हजेरी लावली.
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणा-या बारवी, बॅरेज, चिखलोली आदी धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे ठाणे जिलतील ही पाणीकपात काही अंशी दूर होण्यास मदत होईल, असे चित्र आहे.