दुस-या कसोटीत पावसामुळे चार दिवस खेळ न झाल्याने निराश झाल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी म्हटले.
‘‘बंगळूरु कसोटीवर पावसाचे सावट होते. पहिल्या दिवशी खेळ झाल्याने आनंदी होतो. मात्र दुसरा आणि तिसरा दिवस पावसात वाहून गेला. एकापाठोपाठ एक चार दिवस खेळ न झाल्याने निराश होणे, साहजिकच आहे. पहिली कसोटी जिंकल्याने तसेच दुस-या कसोटीत आश्वासक सुरुवात झाल्याने आमचा आत्मविश्वास उंचावला होता.
पावसामुळे आमच्या अपेक्षांवर पाणी फेरले. मात्र उर्वरित दोन्ही कसोटीत सातत्य राखताना मालिका जिंकण्याला आमचे प्राधान्य राहील,’’ असा विश्वास भारताच्या कर्णधाराने व्यक्त केला. विराट कोहलीने डावखुरा सलामीवीर शिखर धवनला पाठिंबा दर्शवला आहे.
‘‘विद्यमान मालिकेत धवनला अपेक्षित यश मिळाले नसले मागील दोन दौ-यातील तीन कसोटीत त्याने दोन शतके ठोकलीत, हे विसरून चालणार नाही. बंगळूरुत त्याला सूर गवसला होता. मात्र पावसाने व्यत्यय आणल्याने धवनला मोठी खेळी करण्याची संधी मिळाली नाही,’’ असे कोहली म्हणाला.