दहीहंडीच्या थरांवर चढताना नजरेसमोर उंची दिसत नसली, तरी ती गाठण्याची जिद्द मात्र मनात असते. एकमेकींच्या हातात हात देत, आवाजाच्या संकेतांवर विश्वास ठेवत आणि सरावातून आत्मविश्वास वाढवत नयन फाउंडेशनच्या दृष्टिहीन महिला गोविंदा यंदा पुन्हा दहीहंडीच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाल्या आहेत.
सन २०१४ पासून दृष्टिहीन मुलांचे, तर २०१७ पासून महिलांचे गोविंदा पथक दहीहंडीमध्ये सहभागी होत आहे. यंदा सुमारे २० महिला गोविंदा तीन थरांचे आव्हान पेलणार असून, आषाढी एकादशी पासून त्यांच्या सरावाला सुरुवात झाली आहे. थरांची उंची वाढवत असताना पडण्याची भीती नाही, तर एकमेकींवरचा विश्वास आणि ‘आपण हे करू शकतो’ हा आत्मविश्वास या सरावाचा आधार ठरला आहे.
२०१४ पासून पुरुष पथक हे करत आहेत. चार थरांचा सराव पूर्ण झाला असून, पाचव्या थराचे आव्हान पेलण्याची त्यांची तयारी सुरू आहे. दहीहंडीच्या दिवशी मुंबईतील सुमारे दहा ठिकाणी सहभागी होत महिला आणि पुरुष गोविंदा आपली कला सादर करणार आहेत. डोळ्यांना दिसणाऱ्या उंचीपलीकडे जाऊन आत्मविश्वासाची उंची गाठणाऱ्या या गोविंदांसाठी दहीहंडी म्हणजे केवळ हंडी फोडण्याचा उत्सव नाही; तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आणि तो जगासमोर मांडण्याचा दिवस आहे.
पथकातील २५ वर्षीय रोहिणी भुतेकर यांच्यासाठी यंदाची दहीहंडी खास आहे. पूर्णपणे दृष्टिहीन असलेल्या रोहिणी पहिल्यांदाच गोविंदा पथकात सहभागी झाल्या आहेत. सुरुवातीची धाकधूक आता सरावामुळे कमी झाली असून, थरावर चढण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. पहिल्यांदा पथकाचा भाग होताना मिळालेला अनुभव त्या उत्साहाने सांगतात. “पहिल्यांदाच पथकात आले आहे. खूप उत्साह आहे. थोडी भीती पण वाटते; पण स्वतःला सिद्ध करण्याचा माझ्यात आत्मविश्वास आहे,” असे रोहिणी सांगतात.
