नेपाळमधील महापुरात मुंबईचे डॉक्टर बेपत्ता झाल्याने नातेवाईक, मित्र मंडळींसह रूग्णही बुचकळ्यात पडले आहेत. अंधेरी पूर्व येथील डॉ. मिलिंद चितळे आणि त्यांची पत्नी जान्हवी चितळे ६१ जणांच्या ग्रुपसोबत मानसरोवर यात्रेला गेले आहेत.
डॉ. मिलिंद चितळे यांच्या मालाडमधील तळ मजल्यावरील दवाखान्याच्या मुख्य दरवाजावर लावलेल्या एका चिठ्ठीद्वारे रुग्णांना कळवण्यात आले होते की, २४ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत दवाखाना बंद राहील. याच काळात डॉक्टर कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. आता नेपाळमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर ही चिठ्ठी वाचून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
उत्साही गिर्यारोहक असलेले डॉ. चितळे
डॉ. चितळे हे पेशाने डॉक्टर असले तरी एक उत्साही गिर्यारोहक आणि सायकलपटू आहेत. त्यांना २००५ मध्ये ‘गिरिमित्र पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांनी ‘हिल्स अँड ट्रेल्स’ नावाची साहसी खेळांशी संबंधित संस्था स्थापन केली होती. डॉक्टर चितळेंनी २३ ऑगस्ट रोजी ६१ जणांच्या ग्रुपसाठी कैलास मानसरोवर यात्रेचे आयोजन केले होते. ते स्वतः आणि त्यांची पत्नी जान्हवी या यात्रेदरम्यान बेपत्ता झालेल्या पर्यटकांमध्ये आहेत.
मालाड डोंगरी येथील त्यांच्या दवाखान्याला भेट दिली, तेव्हा काही रुग्ण आणि शेजाऱ्यांना या दुर्घटनेबद्दल फारशी कल्पना नव्हती. केवळ एका तरुणाला वर्तमानपत्रातील बातमीत चितळेंच्या नावाचा उल्लेख असल्याचं आठवलं.
शेजारीच दागिने विकणाऱ्या एका तरुणीला ते बेपत्ता असल्याचे समजताच धक्का बसला. जशी ही बातमी पसरली, तसे परिसरातील रहिवासी एकत्र आले आणि त्यांनी या मनमिळाऊ व मदत करणाऱ्या डॉक्टरांच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉक्टर चितळेंच्या साहसी मोहिमा
८,००० मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या पर्वतावरील पहिल्या भारतीय नागरी मोहिमेत डॉक्टर चितळे यांनी ‘क्लायंबिंग डॉक्टर’ (मोहिमेतील वैद्यकीय तज्ज्ञ) म्हणून काम केले होते. त्यांनी कांचनगंगा पर्वतावर २३,००० फुटांपेक्षा जास्त उंची गाठली होती. त्यांनी हिमालयीन रांगांमधील ३,००० हून अधिक ट्रेक्स आणि मोहिमा पूर्ण केल्या आहेत, तसेच मुंबई ते गोवा आणि मुंबई ते कन्याकुमारी असा सायकल प्रवासही केला आहे.
सागात अडकलेले ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना
दुसरीकडे, कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्व भाविक शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. धार्मिक यात्रा पूर्ण केल्यानंतर हे भाविक परतीच्या मार्गावर होते. मात्र, तिबेटमधील सागा येथे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांचा पुढील प्रवास रखडला होता. दरम्यान, काठमांडूहून भारतात परतण्यासाठी या भाविकांचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित आहे. त्यामुळे विमानाची वेळ गाठण्यासाठी सागा येथून काठमांडूला वेळेत पोहोचणे आवश्यक होते.
