नागाव फाटा येथे 16 चाकी मालवाहतूक ट्रक घसरला; महामार्गावरील वाहतूक ठप्प

पुणे-बंगलूर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे एक अपघात झाला. यात रस्त्याचा अंदाज न आल्याने 16 चाकी मालवाहू ट्रक महामार्गावरून पलटी होऊन सेवा रस्त्यावरील टेम्पोला धडकला. ही घटना बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

सोळा चाकी ट्रक चालक आनंदा महादेव कांबळे (रा.कर्नाटक) हा राजस्थानहून कापडाच्या गाठी भरून तामिळनाडूकडे चालला होता. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास नागाव फाटा येथे आला असता रस्त्याचा अंदाज न आल्याने महामार्गावरून थेट सेवा रस्त्यावर पार्किंग केलेल्या टेम्पोला भरधाव ट्रकची धडक बसली व ट्रक पलटी झाला. यावेळी टेम्पोचालक मुश्ताक अहमद इकबाल पटेल (रा.वड्डी, ता.मिरज, जि. सांगली) हा साखरझोपेत होता. तो गंभीर जखमी झाला आहे. तर १६ चाकी ट्रक पलटी होऊन ट्रकचे व मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हा ट्रक इचलकरंजी येथील असल्याचे समजते.अपघातानंतर तत्काळ ट्रक चालकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी टेम्पो चालकास रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात पाठवले. त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मिरज येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे.

महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू

सध्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. बराचसा भाग सहा पदरीकरण झाला आहे. त्यामुळे वाहतूक सुरू आहे. पण ज्याठिकाणी सहापदरी रस्ता संपून चारपदरी रस्ता पुन्हा सुरू होतो, त्याठिकाणी दिशादर्शक बोर्ड किंवा रेडियम स्टिकर लावणे अपेक्षित आहे. पण अशी कोणतीही खबरदारी या विभागाने घेतली नसल्याने हा अपघात त्याचीच प्रचिती आहे. हा ट्रक सुद्धा सहा पदरी रस्त्यावरून येऊन रस्ता संपल्याचा अंदाज न आल्याने चार पदरी वर न वळता थेट सेवा रस्त्यावर कोसळून उभ्या असलेल्या टेम्पोला धडकला.

पोलिसांचेही नियोजन शून्य

सांगली फाटा, नागाव फाटा, मयूर फाटा, शिये फाटा, कासारवाडी फाटा या सर्व ठिकाणी उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे वाहतुकीची नेहमी प्रचंड कोंडी निर्माण होते. पण ही कोंडी सोडवण्यासाठी शिरोली एमआयडीसी अथवा महामार्ग पोलिस कधीही उपस्थित नसतात हे वास्तव आहे. या समस्येकडे पोलीस प्रशासन व रस्ते विकास अधिकारी गांभीर्याने कधी लक्ष घालणार?, असा प्रश्न विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *