मुख्यमंत्री कार्यालयाने अऱबी समुद्र खवळण्याची शक्यता असून, मच्छिमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी
✅हवामान खात्याच्या अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत.
✅स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
✅खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णतः टाळावे.
✅लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावे.
✅सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने (लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट) जवळ बाळगावीत.
✅संभाव्य वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील होड्या व बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात.
✅समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.
कशी असेल हवामान स्थिती?
हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकले असून, अरबी समुद्रासह कोमोरिन क्षेत्र आणि श्रीलंकेतील बहुतेक भाग या वाऱ्यांनी व्यापला आहे. तर तिथं बंगालच्या उपसागरातही वाऱ्यांनी समाधानकारक वेग धारण केला आहे. 13 मे रोजी बंगालच्या उपसागरासह अंदमान- निकोबार इथं दाखल झालेल्या या मान्सूनच्या वाऱ्यांनी 17 मे पर्यंत संपूर्ण अंदमान आणि निकोबार व्यापला आणि श्रीलंकेचा भाग व्यापत या मान्सूननं कन्याकुमारीच्या दक्षिणेकडी सागरी हद्दीत प्रवेश केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून मालदीवला पूर्णपणे व्यापत दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात पुढील प्रवास सुरू करेल. सध्या कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत असल्यानं पुढील काही दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात अर्थात कर्नाटक, गोवा आणि कोकण किनारपट्टी भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. ज्यामुळं आता केरळात मान्सून 27 मे आणि त्यानंतर 1 ते 5 जूनदरम्यान तो महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे.