सध्या मंत्रालय आहे त्याच इमारतीला लागून लागूनच मंत्रालय ॲनेक्सची पाच मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी साधारम 110 कोटी रुपये इतका खर्च येणार असून या इमारतीत सुसज्ज दालनं तयार केली जाणार आहेत. नव्या इमारतीचं बाह्यस्वरूप सध्याच्या मंत्रालय इमारतीशी सुसंगत असणार आहे ही लक्षात घेण्याजोगी बाब.
सध्याच्या घडीला काही मंत्र्यांना विधानभवनात, तर काही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या सातव्या मजल्यावर जागा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सध्या 40 मंत्री आहेत त्यामुळं या मंत्र्यांपैकी काहींना मंत्रालयाच्या नव्या इमारतीत दालन दिलं जाणार आहे.
मंत्र्यांची कमाल संख्या नव्या महायुती सरकारच्या येण्यानंतर पूर्ण झाली असून, आता मंत्र्यांना मंत्रालयातून कार्यभार सांभाळण्यासाठी दालनं उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. प्रत्यक्षात अनेक मंत्र्यांची कार्यालयं मंत्रालयाबाहेर असल्यानं त्याचा परिणाम राज्याच्या कामकाजावर होत आहे. ज्यामुळं कारभार सुरळीत होण्यासाठी, मंत्रीमहोयदयांच्या भेटीसाठी येणाऱ्यांना पुरेशी आसनव्यवस्था असेल अशा दालनांची मागणी सातत्यानं केली जात होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर मंत्रालयासाठी नव्या सहइमारतीच्या बांधकामाची जबाबदारी सोपवली.
काय असतील नव्या इमारतीची वैशिष्ट्य?
मंत्रालयाची नवी इमारत साधारण 100 दिवसांत बांधून पूर्ण करण्याचा मानस ठेवण्यात आला आहे. किंबहुना त्यासाठी मंत्रालयाशेजारीच असणाऱ्या उद्यानावर इमारतीचं बांधकाम हातीसुद्धा घेण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार पालिकेनं इथं तळ मजला अधिक पाच अशा बांधकामास परवानगी दिल्याचं कळतं. ही संपूर्ण इमारत प्री फॅब अर्थात आधुनिक तंत्रानं सिमेंट आणि स्टीलपासून पर्यावरणपूरक निकषांवर तयार केली जाईल.
इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर मंत्र्यांना शासकीय बैठका घेण्यासाठी स्वतंत्र बैठक कक्ष असेल. तर, इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चार मंत्र्यांची दालनं आणि कर्मचारी कार्यालय असेल. मंत्रालयाच्या या नव्या इमारतीच्या तळ मजल्यावर इथं येणाऱ्यांसाठी चहापानाची सुविधा पुरवणारी यंत्रणा/ कॉफी हाऊस किंवा तत्सम आस्थापना असेल. तेव्हा हे नवं मंत्रालय प्रत्यक्षात कसं दिसेल आणि त्यावर विरोधकांचं म्हणणं काय हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.