भारत- पाकिस्तान तणावादरम्यानच हवाई वाहतुकीवर याचे थेट परिणाम दिसून आले. जिथं देशातील तब्बल 32 विमानतळं काही दिवस नागरी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र शस्त्रसंधीनंतर हे चित्र काही अंशी बदलताना दिसलं. पुन्हा एकदा विमानतळांवरील वाहतूक तर सुरू झाली खरी, मात्र अनेक उड्डाणं रद्द झाल्यां प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यातच आता विमानप्रवास करणाऱ्यांना आणखी एक फटका बसला आहे. तो म्हणजे तिकीट दरवाढीचा.
विमानप्रवास महागला…
विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाच्या वतीनं मंजुरी मिळाल्यानंतर विमान प्रवासादरम्यानच्या प्रवासी सुविधा निर्माण शुल्काची (युझर डेव्हलपमेंट फी) अंमलबजावणी सुरू होणार असून, त्यामुळं 16 मे पासून विमान प्रवासभाजं महागणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठीचे तिकीट दर या अंमलबजावणीनंतर वाढणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार वाढील शुल्काची ही नियमावली 31 मार्च 2029 पर्यंत लागू असेल. त्यामुळं इथून पुढं विमान तिकीट काढताना खात्यावर पुरेसे पैसे आहेत की नाही हेसुद्धा पाहूनच घ्या.
किती फरकानं महागणार विमान तिकीट?
विमान प्रवासाच्या तिकीटदरांमध्ये होणारी ही वाढ मोठी नसली तरीही कर आणि इतर सुविधा जोडल्यानंतर अंतिम स्वरुपात दिसणारं तिकीटभाडं हे जास्तच असल्याचनं प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार हे स्पष्ट होत आहे.
सदर भाडेवाढीनंतर देशांतर्गत प्रवासासाठी 175 रुपये तर परदेशवारीसाठी 615 रुपयांचं वाढीव शुल्क मोजावं लागणार आहे. विमान तिकीटातच ही रक्कम जोडली जाणार आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ऑगस्ट, 2024 पर्यंत देशांतर्गत प्रवासासाठी हे शुल्क 120 रुपये इतकं होतं. सध्या ही रक्कम फक्त आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लागू होती.
आता मात्र मुंबईत येणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांकडून या अंमलबजावणीअंतर्गत 75 रुपये, तर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 260 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. या शुल्कवाढीमुळं देशांतर्गत तिकिटांसाठी 250 आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 875 रुपये इतकी जास्तीची रक्कम मोजावी लागणार आहे.
सर्वसाधारणपणे हे शुल्क एखाद्या विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांवर लावण्यात येतं. आता मात्र मुंबई विमानतळावर हा नियम सर्व विमानप्रवाशांसाठी लागू असेल.