महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे आणि उपराजधानी असलेलं नागपूर शहर लवकरच वंदे भारत ट्रेनने जोडलं जाण्याची शक्यता आहे. या मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा देण्याचा विचार रेल्वेकडून सुरु असल्याचं वृत्त आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या एका विधानामुळे पुणे-नागपूर वंदे भारत प्रवास लवकरच करण्याची संधी मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर-पुणे या राज्यातील सर्वात व्यस्त मार्गावर वंदे भारत सेवा सुरु करण्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी नुकत्याच दोन मार्गांवर रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा दाखवताना म्हटलं आहे.
सध्याची अवस्था काय?
सध्या पुणे आणि नागपूर या महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या शहरांदरम्यान रेल्वेने प्रवास करताना सध्या 14 ते 16 तासांचा कालावधी लागतो. अनेकदा या मार्गावरील रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा या मार्गावर कन्फॉर्म तिकीटं मिळत नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार असते. या मार्गावर अधिक वेगवान आणि अधिक परिणामकारक पद्धतीने धावणाऱ्या ट्रेन सोडण्याची आवश्यकता आहे. हीच गरज लक्षात घेऊन या मार्गावर वंदे भारत सुरु करण्याची मागणीही बऱ्याच काळापासून होत आहे.
