दहा तास शर्थीचे प्रयत्न, अख्खी विहीर उपसली अन् दोन लहानग्यांची बॉडी सापडली, गाव सुन्न, काय घडलं?

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील एका शेतात विहीर अंगावर पडल्याने पोहत असलेले दोन चिमुकले विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले होते.महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग,अग्निशामक दल विभागाच्या अथक प्रयत्नानंतर त्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस प्रशासन,आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे हे तळ ठोकून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बसले होते. विहिरीमधील संपूर्ण पाणी बाहेर काढून, ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन चिमुकल्यांना बाहेर काढले. दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज (2 मे) सकाळी दोन्ही चिमुकल्यांच्या मृतदेहावर पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. भीमरत्न हरीचंद्र राजगुरू(वय 14 वर्षे,रा बोरामणी,ता दक्षिण सोलापूर),नैतिक सोमनाथ माने(वय 15 वर्षे,रा,बोरामणी,ता दक्षिण सोलापूर) असे मृत मुलांची नावे आहेत.

पोहताना मुलांच्या अंगावर विहीर कोसळली

सोलापूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बोरामणी गावातील शेळके यांच्या विहिरीत गुरुवारी दुपारी शालेय मुलं पोहायला गेली होती. साडेबाराच्या सुमारास मुलं पोहत असताना, विहिरीचा कठडा घसरला आणि विहीर अंगावर पडली.दगड आणि मातीचा ढिगारा पोहत असलेल्या मुलांवर कोसळला.भीमरत्न राजगुरू आणि नैतिक माने ही दोन्ही मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली. बाकीची चार ते पाच मुलं कशीबशी बाहेर आली. वाचलेल्या मुलांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून घेतले.

रात्री दोन्ही मृतदेह बाहेर काढली

घटनेची माहिती मिळताच ताबडतोब प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील पाणी आणि ढिगारा बाहेर काढल्याशिवाय पर्याय नसल्याने दिवसभर विहिरीमधील पाणी बाहेर काढण्यात आले. JCB च्या साह्याने विहीरीमधील माती बाहेर काढण्यात आली. गुरुवारी(1मे) रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. मध्यरात्रीच्या सुमारास भीमरत्न राजगुरू आणि नैतिक माने यांचा मृतदेह समोर आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी त्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांना मृत घोषित केले आणि पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. विहीर अंगावर कोसळून दोन शालेय विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला, त्यामुळे बोरामणी गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *