देशभरात सध्या राज्या-राज्यानुसार हवामानात बदल होत असून, अगदी एकाच राज्यातही हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पूर्वोत्तर भारतामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर, उत्तर भारतात मात्र उष्णतेचा कहर सुरूच आहे. तिथं हिमाचल प्रदेशच्या पर्वतीय भागांमध्ये तापमानात घट झाली असून, काही ठिकाणी हिमवृष्टीसही सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्याच एप्रिल अखेरीस राज्यातील मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही अंशी तापमानात घट झाली आहे, तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरनिर्मिती होताना दिसत आहे.
विदर्भात तापमानाचा पारा घसरला…
विदर्भातील बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा काही अंशांनी घसरला असून, त्यामुळं पुढील 24 तासांमध्ये अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवत या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
